मुंबई : लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव पत्कारावा लागला. त्यांना केवळ १ जागेवर विजय मिळविला आला. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमधील निवडणुकीतही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. या कामगिरीचे पडसाद पक्षामध्ये उमटले आहेत. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यातच पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस बजावण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सदर नोटीस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून जारी करण्यात आल्याचे समजते. या नोटीसमध्ये प्रवक्त्यांना महायुतीबाबत राजकीय भाष्य करताना पक्षनेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद देण्यात आली आहे.
जागावाटपाच्या आकड्यावरुन वाद झाल्याने प्रवक्त्यांना सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याकडून वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत होती. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाच ही वक्तव्य आल्याने समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर डॅमेज कंट्रोल म्हणून पक्षाने ही कारवाई केली आहे, असे मानले जात आहे.