सातारा, (प्रतिनिधी) – सातारा पालिकेच्या वतीने अजिंक्यतारा किल्ल्याचा परिसर आकर्षक पथदिव्यांनी उजळवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 19 दिवे बसवण्यात आले असून या दिव्यांमुळे किल्ल्याकडे जाणारा अडीच किलोमीटरचा रस्ता दिव्यांनी उजळून निघाला आहे. त्यामुळे या किल्ल्याचे मनोहारी दृश्य सातारा शहरातून कुठूनही दिसत आहे.
सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर अजिंक्यतारा किल्ला पालिकेच्या अखत्यारित आल्यानंतर या भागात पायाभूत सुविधांची कामे गतिमान झाली. या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली होती. या रस्त्यावरून गाडी चालवणे दूर चालणे कठीण बनले होते.
पालिका प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटीचा निधी मंजूर करून कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेतले. काँक्रिटीकरण व दरीच्या बाजूला संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने किल्ल्याच्या वैभवात भर घालतील असे पथदिवे बसवण्याचे काम हाती घेतले.
हे पथदिवे पुणे येथे तयार करण्यात आले आहेत. त्याची उंची नऊ मीटर इतकी आहे. निर्मितीसाठी पोलाद व धातूचा वापर करून त्या खांबावर वेगळ्या स्वरूपाचे नक्षीकाम करण्यात आले आहे एका खांबाचे वजन जवळपास अर्धा टन असल्याचे सांगितले जात आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये 19 पथदिवे बसवण्यात आले असून एकूण 75 पद्धतीने बसविले जाणार आहेत. सर्व पद्धतीने किल्ल्यावर पोहोच करण्यात आले असून सध्या पालिकेच्या वतीने वीज जोडणीचे काम सुरू आहे.