Rahul Gandhi in Parliament । काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीआज सभागृहात पहिले भाषण केले. राहुल यांनी आपल्या भाषणाला ‘जय संविधाना’च्या घोषणा देऊन सुरुवात केली. संविधानाची प्रत हातात घेऊन आम्ही तिचे रक्षण केल्याचे सांगितले. त्याच्या रक्षणासाठी देश एकत्र आला आहे. भाजपचे लोक संविधान-संविधान म्हणतात हे पाहून बरे वाटते.
यावेळी राहुल यांनी सभागृहात भगवान शिवाचे चित्र दाखवले, ज्याला सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला त्यावेळी राहुल गांधींनी त्यांना नियमांचे पुस्तक दाखवले. यावेळी राहुल गांधी यांनी अग्निवीर योजना, हिंदुत्व आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :-
१. आम्ही आणि सगळ्या देशाने संविधानाचे रक्षण केले आहे. भाजपचे लोक दर दोन मिनिटांनी संविधान संविधान करत असल्याचे पाहुन चांगले वाटते आहे. गेल्या दहा वर्षांपासून संविधान, भारताचा विचारावर आणि विरोधात बोलणाऱ्यांवर पध्दतशीरपणे हल्ले होत आहेत.
२. भाजपद्वारे थोपवल्या गेलेल्या विचारांना विरोध करणाऱ्यांवर हल्ले झाले. आमचे काही नेते तुरूंगात आहेत त्यांची एकाचीही अद्याप सुटका झाली नाही.
३. सत्तेचे केंद्रीकरण, धनाचे केंद्रीकरण, गरिब, आदिवासींवर होणाऱ्या आक्रमणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना चिरडून टाकले गेले.
४. लोकांना धमकावले गेले, तुरूंगात टाकले गेले. मीही एक पीडित आहे. पंतप्रधानांच्या आदेशाने २० पेक्षा जास्त प्रकरणे, दोन वर्षे कैद, माझे घर हिरावले गेले. माध्यमांतून हल्ले, सलग ५५ तास चौकशी केली गेली. या सगळ्याचा मी आनंद घेतला. चौकशीनंतर अधिकारीच मला म्हणाले की तुम्ही दगडाचे बनले आहात.
५. सभागृहात आम्ही शंकराचे फोटोही दाखवू शकत नाही का? माझ्याकडे आणखी काही प्रतिमा आहेत. त्याही मला दाखवायच्या आहेत असे नमूद करून राहुल यांनी अनेक देवतांच्या प्रतिमा दाखवल्या. भगवान शंकरापासूनच आपण प्रेरणा घेतो असे ते म्हणाले.
६. अभयमुद्रा कॉंग्रेसचे प्रतिक आहे. अभयमुद्रा निर्भयतेचे संकेत आहे, आश्वासन, सुरक्षेचे संकेत आहे. आपल्या सर्व महापुरूषांनी आणि देवतांनी अहिंसा आणि निर्भयतेची शिकवण दिली आहे.
७. प्रभू रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येनही भाजपला संदेश दिला आहे. आपण विजयी होणार असल्याचे अवधेश प्रसाद यांना पहिल्या दिवसापासूनच माहिती होते.
८. नीटमुळे दोन कोटी युवकांचे नुकसान झाले आहे. त्यावर एक दिवस स्वतंत्र चर्चा झाली पाहिजे. गेल्या ७ वर्षांत ७० वेळा पेपर लीक झाले आहेत. संसदेच्या माध्यमातून आम्हाला नीटच्या विद्यार्थ्यांना संदेश पाठवायचा आहे.
९. पंतप्रधान म्हणतात गांधींचा मृत्यू झाला आणि एका चित्रपटाद्वारे त्यांना पुनर्जीवित केले गेले. गांधी मेलेले नाहीत, ते जिवंत आहेत.