Rahul Gandhi | Agniveer | Akshay Gawate : अग्निवीरांना शहीदाचा दर्जा दिला जात नाही आणि भरपाईही दिली जात नाही असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल (दि. १) लोकसभेत केला होता. त्यांचे हे म्हणणे कालच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळले होते.
राहुल यांनी दिशाभूल करू नये असे राजनाथ म्हणाले होते. विशेष म्हणजे ज्या अग्निवीराचा उल्लेख करून राहुल यांनी संसेदत आरोप केले होते त्या अग्निवीराच्या पित्यानेही राहुल यांचा दावा फेटाळला आहे.
राहुल यांचे म्हणणे नाकारात शहीद झालेले अग्निवीर अक्षय गवते यांच्या पित्याने सांगितले की त्यांना १ कोटी १० लाख भरपाई देण्यात आली आहे. अक्षय लक्ष्मण गवते यांचे सीयाचीन येथे अत्यंत प्रतिकूल स्थितीत कर्तव्य बजावत असताना निधन झाले. महाराष्ट्रातील राहणारे गवते हे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे पहिले अग्निवीर ठरले.
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार ज्या अग्निवीराचा देशासाठी कर्तव्य बजावताना मृत्यू होतो त्याच्या कुटुंबीयांना एकरकमी १ कोटी रूपये मदत (सेवा निधी पॅकेजसह) आणि ज्या कालावधीपर्यंत संबंधित सैनिक सेवा बजावू शकला नाही त्याचेही पूर्ण वेतन दिले जाते. अपंगत्व आल्यास अग्निवीराला ४४ लाख रूपये भरपाई दिली जाते व ती अपंगत्व किती प्रमाणात आहे त्यावर अवबलंबून असते.
मात्र नियमित सैनिकांना निवृत्तीनंतर ज्या प्रमाणात पेन्शन मिळते तसे अग्निवीरांना मिळत नाही. केवळ २५ टक्के अग्निवीरांना नंतर लष्कराच्या नियमित सेवेत सामावून घेण्याची तरतूद आहे.
चार वर्षांच्या सेवेनंतर हे होऊ शकते व त्यानंतरच त्यांना सर्व लाभ मिळतात. जर त्या अगोदर त्यांची सेवा समाप्त झाली तर त्यांना याचा लाभ मिळू शकत नाही.
दरम्यान, राहुल गांधी यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही अग्निवीर योजनेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर ही योजना समाप्त केली जाईल असे त्यांनी म्हटले होते.