Uday Samant On Ghatkopar Hoarding | मुंबई घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. यानंतर उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईसह आसपासच्या शहरांतील होर्डिंगचे ऑडिट करुन 30 दिवसांत अहवाल मागविण्यात येईल. तसेच राज्य सरकारने आता जाहिरात फलकांच्या कायद्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
आमदार सुनील शिंदे यांनी अनधिकृत होर्डिंगसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. मुंबईत अजूनही अनधिकृत होर्डिंग आहेत यावर सरकार काय कारवाई करणार, असाही सवाल केला. तर भाई जगताप यांनी ज्या अधिकाऱ्यांनी याला परवानगी दिली त्यांच्यावर काय कारवाई होणार, असा प्रश्न केला होता.
यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी शहरातील सर्व होर्डिंगचे ऑडिट करुन ३० दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, होर्डिंग कायद्यात गरज असल्यास बदल करण्याचेही सूतोवाच दिले आहे. तसेच होर्डिंग जर रेल्वेच्या हद्दीत असेल तर त्यांना संबधित पालिका आणि वाहतूक विभागाला कळवून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मंत्री उदय सामंत म्हणाले, भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी शासन प्रयत्नशील असून डिजिटल होर्डिंग्जसंदर्भातही सर्वेक्षण केले जाईल. अनधिकृत असलेल्या होर्डिंग्जवर नियमानुसार कारवाई केली जाईल. तसेच दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार सार्वजनिक रस्ते व पदपथावरून दृश्यमान होणाऱ्या जाहिरात फलकास परवानगी घेणे अनिवार्य आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे उचित कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली. दरम्यान, घाटकोपर येथे 13 मे 2024 रोजी महाकाय होर्डिंग पडून 17 लोकांचा मृत्यू तर 75 जण जखमी झाले होते.