पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केट यार्डात पुणे बाजार समितीने डमी आडत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिल्याच दिवशी फळ आणि भाजीपाला विभागात डमी आडते आणि गाळ्यापासून १५ फुटांच्या बाहेर शेतीमालाची विक्री करणाऱ्या तब्बल २५ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील ११ जणांकडून रोख स्वरूपात दंड करून १० हजार ८५६ रुपये वसूल करण्यात आले, तर, १४ जणांवर कारवाई करून ४८४ किलो फळे आणि भाजीपाला जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या मालाची फेरविक्री करण्यात येणार आहे. यातून येणारे पैसे बाजार समितीला मिळणार आहेत.
बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्या सूचनेनुसार फळ- भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे, गटप्रमुख नितीन चौरे, दादासाहेब वरघडे, दीपक थोपटे आणि संतोष कुंभारकर यांनी ही कारवाई केली.
घाऊक बाजारात एकीकडे शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे, तर दुसरीकडे डमी आडत्यांच्या दुबार विक्रीमुळे शेतीमालाची ग्राहकांना चढ्या भावाने विक्री होत आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांचेही नुकसान होत आहे, तसेच डमींमुळे वाहतूक कोंडीसह बाजारातील विविध नियमांचे उल्लंघन होत आहे.
नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून बाजार समितीला आल्या होत्या. त्यानुसार बाजार समितीने ही कारवाई हाती घेतली आहे. गाळ्यावर ठरल्यापेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या डमींवर कारवाई करण्यात येणार आहे. काही गाळ्यांवर तब्बल १० ते १२ डमी असल्याचे दिसून येत असल्याचा तक्रारी होत्या.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी बाजार समिती काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीनुसार डमी आडत्यांवर कारवाई सुरू केली आहे. कारवाईचा आजचा पहिला दिवस आहे. सातत्याने ही कारवाई सुरू राहिल. डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती.