नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे राजस्थानातील नेते ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे त्याबद्दल कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच परंपरेनुसार आता उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षांना दिले गेले पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. प्रसार माध्यमांशी बोलताना पायलट यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी राहुल गांधी यांची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि यामुळे इंडिया आघाडीत उत्साहाचे वातावरण असल्याचे नमूद करून ते म्हणाले की लोकसभेत कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे आणि भारतीय जनता पार्टीने आघाडी करून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही.
लोकसभेच्या उपाध्यक्ष पदाबात सरकारची भूमिका चुकीची राहीली आहे व ती परंपरेला अनुसरून नाही. जर अध्यक्षांची निवड सहमतीने आणि निवडणूक न घेता झाली तर उपाध्यक्ष पद विरोधी पक्षांना दिले जाते. संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जेंव्हा होते तेंव्हा हे पद विरोधी पक्षांना दिले गेले होते. आता अंतिम निर्णय काय झाला आहे याची आपल्याला कल्पना नाही. मात्र हा प्रकार लोकशाहीच्या आरोग्यसाठी चांगला नाही असे पायलट म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जेंव्हा उतरली तेंव्हा त्यांचे ३०३ खासदार होते. आता त्यांचे ६५ खासदार कमी झाले आहेत. कॉंग्रेसचे ५४ खासदार होते ते आज १०२ झाले आहेत. आमची संख्या दुप्पट झाली आहे. आम्ही मतदारांसमोर जी भूमिका मांडली, जो जाहीरनामा मांडला त्याला लोकांनी पसंती दर्शवली. आता दोन सहकारी पक्षांसोबत भाजपची आघाडी झाली असल्यामुळे सरकारचे पुढे काय होईल ते सांगता येत नाही असे पायलट यांनी नमूद केले.