Samruddhi Expressway Accident – समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. जालन्यामधील कडवंची गावाजवळ दोन वाहनांच्या भीषण धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आर्टिगाला राँग साईडने येणाऱ्या सिफ्टची धडक बसून हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर दोन्ही वाहने महामार्गावरचे बॅरिकेड मोडून थेट खाली पडली.
या भीषण धडकमेमुळे 6 जणांचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीन जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले आहे.
विरुद्ध दिशेने येणारी ही कार स्थानिक लोकांची होती, अशी माहिती मिळत आहे. गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी ते विरुद्ध दिशेने येत होते. तर नागपूरहून मुंबईच्या दिशेने येणारी कार अतिशय वेगात होती.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर नेहमीच असे अपघात घडत असतात, त्यामुळे अपघातांची ही मालिका रोखण्यासाठी प्रशासनाने महत्वाची पावले उचलून उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.