नावात काय आहे? या प्रश्नाचं ताजं उत्तर म्हणजे नावातच सर्वकाही आहे..! इस्टेट ‘नावावर’ होण्यासाठी भावाभावात भांडणं, मारामार्या होतात; प्रसंगी खुनाखुनीही होते. नाव ‘कमावण्यासाठी’ माणसं कष्ट करतात, ङ्गसवाङ्गसवी करतात, धोके पत्करतात, एवढंच नव्हे तर दुसर्याचं नाव पुसण्याचा प्रयत्नही करतात. जमिनी, घरं, फ्लॅट, दुकानं, कारखाने वगैरे ‘नावावर’ असलेला माणूस हा पृथ्वीवरील एकमेव प्राणी आहे. आपल्या नावावरचं काही दुसर्याच्या नावावर करणं किंवा कुणाला भेट म्हणून देऊन टाकणं सहसा कुणाला जमत नाही. अहो, भेटवस्तूंवरही ‘यांजकडून’ म्हणून नाव कोरल्याखेरीज देणार्याला दिल्यासारखं आणि घेणार्याला घेतल्यासारखं वाटत नाही.
आपल्याला नावच नसतं, तर आपण काय केलं असतं हा विचारही आपल्याला सहन होत नाही. ‘सरांना नाव सांगेन,’ या शाळकरी वयातल्या धमकीपासून अमुक एखादी गोष्ट झाली तर ‘माझं नाव बदलेन,’ अशा पैजेपर्यंत ठिकठिकाणी नावच लागतं. पण ‘नाव बदलेन’ ही पैज कुणी खरी करून दाखवत नसतं. पैज लावणार्या दोन्ही व्यक्तींना हे ठाऊक असतं. विशेषतः राजकारणात कुणी, कुणाशी, कसली पैज लावेल हे सांगता येत नसलं, तरी कोणतीही पैज खरी करून दाखवली जाणार नाही, याची खात्री उभयपक्षीच नव्हे तर जनता जनार्दनालाही असते. त्यामुळे असल्या पैजा विसरण्यातच सर्वांचं भलं असतं.
राजकारणात आश्वासनं जशी लक्षात ठेवली जात नाहीत, तशा पैजाही लक्षात ठेवल्या जात नाहीत.राजकारणात सामान्यतः राजीनामा देण्याची, राजकीय संन्यास घेण्याची किंवा हिमालयात वगैरे जाण्याची पैज लावली जाते; पण ज्या नावात आपला जीव अडकलेला असतो, ते बदलण्याची पैज लावणारा आणि मुख्य म्हणजे पाळणारा नेता आंध्र प्रदेशात नुकताच पाहायला मिळाला. राज्याचे माजी मंत्री आणि वायआरएस काँग्रेसचे नेते मुद्रगदा पद्मनाभम यांनी हा विक्रम त्यांच्या ‘नावावर’ केलाय. आंध्र प्रदेशच्या राजकारणात बरीच उलथापालथ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाहायला मिळाली.
चंद्राबाबू नायडूंच्या यशाबरोबरच जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांचीही तिथे जोरदार चर्चा आहे. परंतु ते पिथापुरम या त्यांच्या मतदारसंघातूनच निवडून येणार नाहीत, असं मुद्रगदा पद्मनाभन यांना वाटत होतं. पवन कल्याण विजयी झाले, तर आपण आपलं नाव बदलू, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. परंतु पवन कल्याण यांनी प्रचंड मोठा विजय मिळवला आणि पद्मनाभम अडचणीत आले. आपल्याकडे असं काही घडलं असतं तर आव्हान देणारा नेता ङ्गारतर सात-आठ दिवस विजनवासात गेला असता आणि त्यानंतर पुन्हा पूर्वीच्याच आवेशात नव्यानं डरकाळ्या ङ्गोडू लागला असता. परंतु मुद्रगदा पद्मनाभम यांनी वचन पाळलं.
आपल्या नावातील ‘मुद्रगदा’ हा शब्द त्यांनी काढून टाकलाय आणि यापुढं ते ‘पद्मनाभम रेड्डी’ नावानं ओळखले जाणार आहेत. पद्मनाभम हे निवडणुकीपूर्वीच त्यावेळच्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेेसमध्ये गेले होते. परंतु वायएसआर काँग्रेस इतक्याच जागा जनसेना पक्षाने मिळवल्या. पवन कल्याण आता उपमुख्यमंत्री झालेत… पण गाजले मात्र पद्मनाभम… कारण शब्दाला जागून त्यांनी नाव बदलून घेतलं. या घटनेमुळे महाराष्ट्रातले नेते कमालीचे हादरलेत म्हणे! कारण दिलेला शब्द पूर्ण करण्याचा ‘ट्रेन्ड’ सुरू झाला तर मंचावरून बोलायचं तरी काय?