पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : मार्केट यार्डातील फळ- भाजीपाला विभागात दरवर्षी हजारो वारकरी मुक्कामाला असतात. पाण्यासह इतर आवश्यक सुविधा बाजार समिती प्रशासन उपलब्ध करून देते. व्यापाऱ्यांकडून सेवा करण्यात येते.
मात्र, यंदा वारकऱ्यांना राडारोडा, फळे- भाजीपाल्याच्या पडलेल्या कचऱ्याचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी याची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे पंधरा दिवस वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम तर होणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समितीच्या या ढिसाळ कारभाराबद्दल बाजार घटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
आज (रविवार, दि. ३०) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन होणार आहे. पालख्यांचा उद्याही पुण्यातच मुक्काम आहे. रविवार असल्याने आज शेतीमालाची नेहमीच्या तुलनेत जास्त आवक होत असते. त्यामुळे बाजारात प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, ते झालेले दिसून येत नाही.
मार्केट यार्डात दरवर्षी भुसार, फळ- भाजीपाला विभागात हजारो वारकऱ्यांची राहण्याची सोय केली जाते. व्यापाऱ्यांकडून जेवण दिले जाते. विविध शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, यंदा गणित उलटे आहे.
मार्केट यार्डात ठिकठिकाणी असलेल्या फळ, भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे वारकऱ्यांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समितीने स्वच्छता न केल्यामुळे बाजार घटकांमध्ये नाराजी आहे.
वारीच्या काळामध्ये फळे, भाजीपाला रस्त्यावर टाकू नका, अशा सूचना व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी ऐकले नाही. त्यात पाऊस झाल्याने भर पडली आहे. आता (संध्याकाळी) साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मी स्वतः राउंड घेऊन पाहणी करणार आहे.
– डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती.
डमींना कोणाचे आशीर्वाद?
एकीकडे डमी आडत्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत डमी आडत्यांकडून मालाची विक्री करण्यात येत आहे. डमींना वेळेचे बंधन नाही का, कुणाच्या वरदहस्ताने ते विक्री करत आहेत, असाही प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.