देहू, (वार्ताहर) –
माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ॥
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ॥
वारकरी आणि विठ्ठलाच्या प्रेमळ नात्याचे प्रतीक असलेली आषाढी वारी प्रारंभ झाली आहे. मुखी विठ्ठलाचे नाम जपत, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी घेऊन लाखो वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत. ३३९ वा पालखी सोहळ्याचे शुक्रवारी विधिवत प्रस्थान झाले. संपूर्ण देहनगरी विठ्ठल-विठ्ठल आणि ज्ञानबा-तुकाराम च्या जयघोषाने दुमदुमून गेली होती.
प्रस्थान सोहळ्याकरिता दाखल झालेले राज्य-परराज्यातील वारकरी, वरुणराजाचा आगमनानंतर बहरलेला आसमंत, ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष, मुखी संतांचे अभंग आणि विठूनामाचा गजर, टाळ मृदंगाचा ताल, विणेचा झंकार आणि भजन-कीर्तन यामुळे शुद्ध होणार्या वृत्ती,
निसर्गाची साथ आणि त्या सावळ्या रुपाचं दर्शन घेण्याची आस ठेवत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने पंढरीकडे प्रस्थान ठेवले. लहान-थोर, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी आदी भेद मिटवणारी ही आनंदवारी यंदा मोठ्या दिमाखात निघाली आहे. हा मनोरम सोहळा आज देहूतील इनामदार वाड्यात मुक्कामासाठी विसावला. तर या सोहळ्याचा शनिवारी (दि.29) आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम असणार आहे.
प्रस्थानाच्या कार्यक्रमासाठी हजारो वारकर्यांनी सकाळपासूनच राज्यभरातील वारकर्यांनी देहूतील मंदिरात गर्दी केली होती. देऊळवाड्यामध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा अखंड जप सुरू होता. दरवर्षीप्रमाणे वारकर्यांनी यावेळी विविध संप्रदायिक खेळही करून दाखवले. ज्ञानोबा-तुकोबाचा अखंड गजर आणि भक्तीच्या महासागराने संपूर्ण देहूनगरी न्हाऊन निघाली होती.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता प्रस्थान सोहळ्यावेळी मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर भाविकांच्या सेवेत कोणतीही कसर राहू नये, याकरिता विविध ठिकाणी सामाजिक मंडळांकडून अन्नदान करण्यात आले.
राज्याच्या कानाकोपर्यातून आलेले वारकरी, भक्त आणि भाविकांच्या भक्तीउत्सवामुळे श्रीक्षेत्र देहू अक्षरश: भक्तीमय झाले आहे. राहुट्या व धर्मशाळांमधून हरिनामाच्या जयघोषाने देहूनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी चेन्नईवरून खास छत्री मागवण्यात आली आहे.
प्रस्थान सोहळ्याकरिता या छत्रीचा वापर करण्यात आला. तर कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याकडून प्रस्थान सोहळ्याकरिता राजाश्रयाच्या जरी पताका पाठविण्यात आल्या होत्या. या पाताकांमधून भक्तीशक्तीचा अनोखा संगम पहायला मिळाला.
खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार अश्विनी जगताप, सुनील शेळके, आमदार महेश लांडगे हे प्रस्थान सोहळ्यासाठी मंदिरात उपस्थित होते. या लोकप्रतिनिधींनी प्रस्थानादरम्यान फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. तर प्रस्थान सोहळ्यादरम्यान दिड्यांमधील वारकर्यांनी विविध सांप्रदायिक खेळ सादर केले.