मंचर, (प्रतिनिधी) – कळंब (ता.आंबेगाव) येथे झालेल्या अपघातामुळे भालेराव कुटुंबातील ओम भालेराव या एकुलता एक मुलाचे अपघाती निधन झाल्याने भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आमचा एकुलता एक आधार गेल्याचे सांगत आता जगाचे कशासाठी, असे म्हणत भालेराव कुटुंबीयांनी टाहो फोडला.
कळंब येथे पुणे नाशिक हायवेवर टोयोटा कंपनीची फाॅर्च्युनर आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्याने ओम सुनील भालेराव (वय २०, रा. कळंब ता. आंबेगाव) याचा मृत्यू झाला असल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी मयुर साहेबराव मोहिते (रा. मोहितेवाडी शेलपिंपळगाव ता. खेड) याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या अपघातामुळे भालेराव कुटुंबातील ओम भालेराव हा एकुलता एक मुलगा निधन पावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आमचा एकुलता एक आधार गेला असल्याचे भालेराव कुटुंबीय सांगत आहे.
ओम भालेराव हा कुटुंबातील सर्वांचा लाडका होता. सर्वांमध्ये मिळून मिसळून वागत होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वडिलांकडे आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा, असा आग्रह केला होता. आपल्याला भरपूर शेती आहे, ट्रॅक्टरच्या माध्यमातून चांगली शेती करता येईल, असे तो वडिलांना म्हणाला होता.
पाच मिनिटात येतो म्हणाला….
भालेराव कुटुंब एकत्र कुटुंब असून अपघाताचे दिवशी ओम याला त्याच्या वडिलांनी, आजोबांनी लवकर जेवायला ये, आम्ही वाट पाहत आहोत, असे फोनवर सांगितले होते. तेव्हा ओम याने तुम्ही जेवायला घ्या, मी पाच मिनिटात आलो, असे म्हणाला होता.
मात्र, काही वेळातच त्याच्या अपघाताची बातमी समजली व या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील एक कर्ता तरुण गेल्याने आता आम्ही कुणासाठी जगायचे, असा भावनिक प्रश्न ओम भालेराव यांच्या कुटुंबीयांनी विचारला आहे.