T20 World Cup 2024 – रोमांचक सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवून दुसऱ्यांदा टी-२० विश्वकरंडक जिंकला. रोहितच्या संघाने १७ वर्षांपासूनचा विश्वकरंडक विजयाचा दुष्काळ संपवला. सात महिन्यांपूर्वी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी ५० षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेत विजयाच स्वप्न भंग झाले होते. त्यावेळी कोट्यवधी भारतीयांच मन मोडले होते. ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती. आता टी-२० विश्वकरंडकातील विजयानंतर देशभर सेलिब्रेशन सुरु आहे.
दिल्ली, मुंबई, लखनऊ, भोपाळ, जयपूर, चंदीगड उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र विजयाचा फक्त जल्लोष दिसला. खेळाडूंनी मैदानावर सेलिब्रेशन केले, तर सर्वसामान्यांनी रस्त्यावर फटाके फोडून, तिरंगा फडकवून सेलिब्रेशन केले. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती, संघाच्या मायदेशी परतण्याची. मायदेशात त्यांचे जंगी स्वागत होणार आहे.
भारतीय संघ बारबाडोसमध्येच आहे. ३० जून हा राखीव दिवस ठेवला गेला होता. त्यामुळे सोमवारी भारतीय संघ बारबाडोसवरुन न्यूयॉर्कसाठी रवाना होईल. मंगळवारी न्यूयॉर्क येथून एमिरेट्स फ्लाइटने दुबईला जाणार आहे. तिथून भारतीय संघ भारतात येईल. बुधवारपर्यंत संघ भारतात परतणार आहे.
विजयी मिरवणूक निघणार
दुबईवरुन खेळाडू मुंबईला जाणार की, दिल्लीला. याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मायदेशी परतल्यावर संघाचे जंगी स्वागत होणार असून विजयी मिरवणूक निघेल. भारत चार विश्वकरंडक जिंकणारा क्रिकेट विश्वातील तिसरा संघ बनला आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या नावावर हा विक्रम होता. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 7 वेळा आणि वेस्ट इंडिजने चारवेळा विश्वकरंडक जिंकला आहे.