सातारा, (प्रतिनिधी)- सातारा शहराची लाईफलाईन असलेल्या कास तलावामध्ये तब्बल 45 फूट पाणीसाठा आहे. अजूनही म्हणावा तसा पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही.
मात्र. कादी दिवसांपूर्वी झालेल्या पूर्व मोसमी दमदार पावसाने कासची पाणी पातळी सहा फुटाने वाढली आहे. तरी सुद्धा सातारा नगरपालिका पाणी कपातीचे वेळापत्रक मागे घ्यायला तयार नाही.
वारंवार होणारा अपुरा पाणीपुरवठा तसेच पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ यामुळे सातारकर वैतागले आहेत.
कास धरणामध्ये सध्या 45 फूट पाणीसाठा आहे. सातारा शहरात सुमारे 17 हून अधिक साठवण टाक्या आहेत.
या टाक्यांमधून शहराच्या विविध प्रभागांत पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी कपातीमुळे मागील दोन महिन्यांपासून या टाक्यांवर आधारित प्रभागात वेळापत्रकानुसार पाणी कपात सुरू आहे.
मात्र, सध्या सुरू झालेल्या पावसामुळे विशेषतः पूर्वमोसमी पावसामुळे कास धरणाच्या पाणीसाठा सहा फुटाने वाढला आहे. कास धरणाची एकूण क्षमता 0.5 टीएमसी इतकी झाली आहे.
पाणीपुरवठा विभागाने मार्च महिन्यामध्ये सातारा शहरासाठी पाणी कपात जाहीर केली होती. अजूनही ती मागे घेण्यात आलेली नाही. शहराच्या पश्चिम भागाला विशेषतः मंगळवार पेठ, बोगदा परिसर, ढोणे कॉलनी, रामाचा गोट, सोहनीची गिरणी परिसर,
केसरकर पेठ, गुरुवार पेठ, सर्वोदय कॉलनी येथे कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. तसेच साठवण टाक्यांची स्वच्छता झाली असली तरी अजूनही गाळमिश्रित पाण्याचे प्रमाण थांबलेले नाही. त्यामुळे सातारकरांना शुद्ध पाणी मिळेनासे झाले आहे.
मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून कपातीबाबत निर्णय घेणार
मंगळवार पेठेतील काही भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक रवींद्र ढोणे यांनी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. भाजपचे माजी नगरसेवक विजय काटवटे यांनीसुद्धा या संदर्भात आंदोलनाचा इशारा देऊन पाणीपुरवठ्याची पोलखोलच केली होती.
यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पाणीपुरवठ्याच्या गाळ मिश्रणाचे व गळतीचे कारण शोधले जात असून लवकरच त्या त्रुटी दुरुस्त केल्या जातील. पाणी कपात वेळापत्रक कधी मागे घ्यायचे यासंदर्भात मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय जाहीर केला जाईल .