देहूगाव, (रामकुमार आगरवाल} –
भेटी लागी जीवा लागलीसे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥
पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुरलेले वारकरी भागवत धर्माची पताका उंचावित, टाळ-मृदंग, चिपळ्यांचा नाद करीत, भगवंताला साद घालत, सावळ्या विठोबाच्या दर्शनाची आस मनी धरुन वैष्णवांची मांदयाळी….हरि नामाचा जयघोष व ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, तुकारामच्या नामघोषात इनामदार वाड्यातील पहिला मुक्काम संपवून तुकोबारायांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड उद्योगनगरीकडे मार्गस्थ झाला.
जगदगुरू संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या तिर्थक्षेत्र देहूतून फुलांच्या वर्षावात भावपूर्ण निरोप घेतला. आपले निस्सीम मुस्लीम भक्त अनगडशाहवली बाबाच्या दर्ग्याला भेट दिली तर, शनी मंदिराजवळ विसावा घेतला.
पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला आतुरलेला वैष्णवांचा मेळा फुलांनी सजविलेला रथासह आषाढी वारी ३३९ वा पालखी सोहळा सकाळी ११ च्या सुमारास इनामदार वाड्यातून तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पांडुरंगाच्या भेटीची ओढीने वारकऱ्याच्या चेहऱ्यांवर समाधान दिसत होते.
तत्पूर्वी सकाळी भागवत बुवा गोळेगावकर यांचे कीर्तन झाले. देहूतील इनामदार वाड्यात सकाळी नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, तहसिलदार जयराज देशमुख, देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या हस्ते पाद्यपूजन झाले.
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, वंशज दिलीप गोसावी, पोलीस उपायुक्त बापू बांगर,
नायब तहसिलदार प्रवीण ढमाले, गटविकास अधिकारी भूषण जोशी, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटराव पाटील, मंडलाधिकारी दिनेश नरवडे, संजय सईद, तलाठी अतुल गीते, अतुल माने, सूर्यकांत काळे, माजी सरपंच कांतिलाल काळोखे आदी उपस्थित होते.
शासकीय अधिकाऱ्यांच्या पूजेनंतर भाविकांना दर्शनार्थ सोडण्यात येत होते. अकराच्या सुमारास खांदेकरी तान्हाजी कळमकर, नामदेव भिंगारदिवे, काशिनाथ कळमकर, तंबाजी पवार, संभाजी कांबळे,
अनिल गायकवाड यासह ग्रामस्थांनी पालखी खाद्यांवर घेताच भाविकांनी पुंडलिका वरदा हरि विठ्ठल नामाचा जयघोष केला आणि पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडली. ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयाजवळ नगरपंचायतच्या वतीने उपरणे, श्रीफळ, प्राथमिक उपचारासाठी औषधांचे किट दिंड्यांच्या वीणेकरीला देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पालखीवर पुष्पवृष्टी
ग्रामस्थांचा निरोप घेत पालखी प्रवेशद्वाराजवळ येताच ग्रामस्थांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. साडेबाराच्या सुमारास भाविकांनी पालखी महाराजांचे निस्सीम भक्त अनगडशाहवली दर्ग्याजवळ आल्यावर दर्गा ट्रस्टचे नजीर मुलांनी फारूक मुलांनी बशीर मुलांनी यांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांना मान देण्यात आला.
वैष्णवा संगती, सुख वाटे। हा अभंग झाला. त्यानंतर पालखी मार्गावरील पहिली अभंग आरती पोपट बिरदवडे, साधू परंडवाल, प्रीतम वारघडे, भंडारा डोंगर दशमी समितीचे बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते झाली.
आरती नंतर पालखी फुलांनी सजविलेल्या रथात ठेवण्यात आली. परंपरेप्रमाणे नगारखाना सांभाळणारे पांडे कुटुंबियांनी चौघडा वाजविला. अग्रभागी मानाची बैल जुपलेली नगारखाना गाडी त्यामागे अश्व चालू लागले.
पालखी रथापुढे अबदागिरी, गरुडटक्के, परंपरेतील २७ व मागे ३७३ दिंडयासह वैष्णवांचा मेळा मार्गस्थ झाला. मार्गावरील माळवाडी, झेंडमळा, हगवणे, काळोखे मळा, लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले.
सीओडीचे अधिकारी, कर्मचाऱयांनी पालखीचे स्वागत केले. चिंचोली शनी मंदीराजवळ पालखी दुपारी अडीचच्या सुमारास पोहचली.
संतांचिया पायी हा माझा विश्वास ।
सर्वभावें दास झालों त्यांचा ॥
तेचि माझे हित करिती सकळ ।
जेणे हा गोपाळ कृपा करी ॥
भागलिया मज वाहतील कडे ।
त्यांचियानें जोड़े सर्व सुख ॥
तुका म्हणे शेष घेईन आवडी ।
वचन न मोडी बोलिलें तें ।
हा अभंग गात असतानाच पालखी सोहळयाचे मुख्य चोपदार निवृत्ती महाराज गिराम रथावर चढले. अभंग संपताच चोपदार गिराम यांनी दंड उंचावल्यानंतर आरतीला सुरूवात झाली. शनेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, रमेश जाधव, दत्तात्रय लांडगे यांच्या हस्ते आरती झाली. आरती नंतर पालखी सोहळा या ठिकाणी विसावला.वारकऱ्यांनी दुपारची न्याहरी घेवून विसावा घेतला.
विठ्ठल नामाचा जयघोष व तुकाराम, तुकारामच्या नामघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात सोहळा दुपारी साडेतीनच्या सुमारास मार्गस्थ झाला. चिंचोली, अशोकनगरमार्गे सोहळा देहूरोड येथे आल्यावर कॅन्टोमेंट बोर्डाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा स्वागत स्वीकारून पुढे उद्योगनगरीकडे मार्गस्थ झाला. तर, सायंकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी पोहचला.