पुणे – मोठे क्रिकेट खेळायचे असेल आणि स्पर्धेत टिकून रहायचे असेल, तर जिद्द बाळगायला हवी. जिद्द आणि आत्मविश्वास असेल, तर मैदानावर आणि मैदानाबाहेरील आव्हानांचाही सामना समर्थपणे करता येतो असा सल्ला भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने उदयोन्मुख खेळाडूंना दिला. पीवायसी हिंदू जिमखान्याच्या वतीने आयोजित टॉक शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागू यांनी क्लबचे क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, उत्कर्षा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पीवायसी हिंदु जिमखानाचे सदस्य सुचनित राजाध्यक्ष यांनी ऋतुराज गायकवाडची मुलाखत घेतली. तसेच, एमपीएलमधील ४एस पुणेरी बाप्पा संघाचे सर्व खेळाडू, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ऋतुराज गायकवाड बोलत होता.
प्रथम श्रेणीमध्ये झारखंडविरुद्ध मी पदार्पण केले. त्या पहिल्या सामन्यात खूप धावा झाल्या नाहीत. त्या वेळी वरुण अरॉनचा चेंडू लागला होता. बोटाला दुखापत झाली. त्यामुळे पुढे खेळता आले नाही. कारकिर्दीची सुरुवातच दुखापतीने झाली. दोन महिन्यांनंतर मी पुन्हा सरावाला सुरुवात केली. सईद मुश्ताक अली स्पर्धेत पुनरागमन केले. फार चांगली कामगिरी झाली नाही. सहापैकी चार सामन्यात मला बाहेर बसावे लागले. बाहेर बसून मला मेहनतीची कल्पना आली. त्याचा फायदा विजय हजारे करंडक स्पर्धेत झाला, असे ऋतुराजने सांगितले.
भारतीय संघात निवड झाल्याचे कळल्यावर खूप आनंद झाला नाही, कारण सुरुवातीला ती एकाच सामन्यासाठी निवड होती. मला भारतासाठी प्रदिर्घ काळ खेळायची इच्छा होती. त्यामुळे भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद फार काही जल्लोषात साजरा केला नाही. पण, ही भविष्याची सुरुवात असल्याची जाण मला झाली आणि मिळालेली संधी साधण्याची जिद्द बाळगली, असेही ऋतुराजने सांगितले. आयपीएलचा प्रवासही आव्हानात्मक होता. सुरुवातीच्या काळातच कोविडने ग्रासले. त्यातून बाहेर पडल्यावरही मला लगेच खेळायला मिळाले नाही. पूर्ण तंदुरुस्ती नव्हती आणि आत्मविश्वासही गमावला होता. अंबाती रायुडू जखमी झाल्यामुळे मला संधी मिळाली. फार वेळ बाहेर राहिल्यानंतरही माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे मला एक प्रकारचा धीर आला. मार्ग खडतर होता, तरी जिद्दीने आणि सहाकाऱ्यांच्या सहाकार्याने उभा राहू शकलो, असे ऋतुराज म्हणाला.