नवी दिल्ली – लोकसभा सभापती पदाच्या निवडणूकीच्या गोंधळानंतर सभागृहात सर्वकाही सुरळीत सुरु असल्याचे वाटत असतानाच काही मिनिटांतच खेळ पालटला. सर्व खासदारांच्या शुभेच्छांचा स्वीकारल्यानंतर पहिल्याच भाषणात सभापती ओम बिर्ला यांनी आणीबाणीचा उल्लेख केला. आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय असल्याचे ते म्हणाले.
यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ करत या प्रस्तावाला विरोध केला. काँग्रेस खासदारांचा आरोप होता की, सभापती भाजपचा अजेंडा चालवत आहेत. दोन मिनिटांच्या मौनानंतर गुरुवारपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
ओम बिर्ला म्हणाले, हे सभागृह 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाची निंदा करते. आम्ही त्या सर्व लोकांच्या संकल्पाला सलाम करतो, ज्यांनी आणीबाणीला विरोध केला, त्याविरोधात संघर्ष केला आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण केले.
25 जून 1975 हा दिवस भारतीय इतिहासात कायम एक काळा दिवस म्हणून पाहिला जाईल. या दिवशी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानावर हल्ला केला.
भारताकडे संपूर्ण जग लोकशाहीची जननी म्हणून पाहाते. भारताने कायम लोकशाही मुल्य आणि वाद-विवादाचे समर्थन केले आहे. अशा भारतावर इंदिरा गांधींनी हुकूमशाही लादली. लोकशाही मुल्यांचा उपमर्द केला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला.
कायद्यात बदल करुन काँग्रेसने अटक केलेल्या लोकांना न्याय मिळणार नाही याची पूरेपूर काळजी घेतल्याचा आरोप ओम बिर्ला यांनी केला.ओम बिर्ला यांच्या या भाषणावर सभागृहात प्रचंड गदारोळ सुरु झाला. काँग्रेसने आरोप केला की सभापती भारतीय जनता पक्षाचा अजेंडा सभागृहात चालवत आहेत.