अकलूज, (प्रतिनिधी)- ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना समृद्ध बनविण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये नीतिमूल्य वृद्धिंगत करण्यासाठी प्राध्यापकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे त्यामुळे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदल सकारात्मक दृष्टीने स्वीकारले पाहिजेत तरच भारत जगात महासत्ता बनेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय आणि सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रुसा काम्पोनंट 8 अंतर्गत आयोजित ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ या विषयावरील विद्यापीठस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव, प्रा. डॉ. पंचाप्पा वाघमारे, प्रा.डॉ. हनुमंत आवताडे, प्रा. डॉ. भगवान अधटराव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, शैक्षणिक क्षेत्राला आलेली मरगळ नवीन राष्ट्रीय धोरणामुळे झटकली जाईल. विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी आवश्यक असणारी कौशल्ये संपादन करता येतील.
कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्वच विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण मिळावे यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात या शाखेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिके तसेच ऑन- द -जॉब ट्रेनिंग इत्यादींचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे.
ज्ञान संपादनासाठी कला, वाणिज्य, विज्ञान अशी कोणत्याही प्रकारची मर्यादा असणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढावी, त्यांची वैचारिक क्षमता वाढावी, त्यांच्यात नीती मूल्य वृद्धिंगत व्हावीत तसेच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची जिद्द व क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात आवश्यकते बदल करण्यात आले आहेत.