मुंबई : पंचवार्षिकमधील हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे आम्हाला वाटले होते की विरोधक चर्चा करतील. चहापानाला येतील. मात्र, त्यांनी एक पत्र दिले. त्यामध्येही तेच तेच म्हटले आहे. त्यामुळे आमची सभागृहात बोलण्याची आणि उत्तरे देण्याची तयारी आहे. पण विरोधकांची नाही. ते फक्त येतात आणि खोट बोल पण रेटून बोल असे बोलतात. निरोप द्यायला सभागृहात तर यायला पाहिजे ना? की फेसबुक लाईव्ह वरूनच निरोप देणार?, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.एकनाथ शिंदे म्हणाले, या विरोधी पक्ष गोंधळलेला आहे. ते तुमच्यासमोर छाती फुगून आले असतील आणि म्हणाले असतील की महायुतीला लोकसभेत यश मिळाले नाही. त्यामुळे सत्ताधारी पोकळ आश्वासनाची घोषणा करतील. आता नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले. संविधान बदलेल असे खोटे नरेटिव्ह सेट केले. यामध्ये त्यांना क्षणिक आनंद मिळाला असेल. मात्र, शेवटी मोदी पतंप्रधान झाले, असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला.
विरोधकांनी एवढं करूनही काँग्रेसला फक्त ९९ जागा मिळाल्या. म्हणजे तीन टर्ममध्ये ४०, ५० आता ९९. मग आता तुम्हाला २४० पर्यंत पोहण्यासाठी २५ वर्ष लागतील. एवढं सर्व करून काय झालं? शेवटी नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले. त्यामुळे मोदी जिंकले आणि इंडिया आघाडीचा पराभव झाला. तरी सुद्धा आमचे काही लोक दुसऱ्यांच्या वरातीत घोड नाचवणारे आहेत. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. काय चाललंय? किती मत मिळाली?, असे म्हणत ठाकरे गटावर टीका केली.