खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिका हद्दीतील उषानगर येथील श्रीदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत ही इमारत भानवज – काटरंग -मोगलवाडी रोड ही नाल्याच्या अगदी लगत आहे. नाल्याच्या बाजूने इमारती लगत संरक्षक भिंत आहे.
ही संरक्षक भिंत जुलै 2023 रोजी कोसळल्याने इमारतीस व पर्यायाने नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. समस्या सोडविण्यासाठी स्थानिकांची मागणी आहे. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी यावर तोडगा काढण्याचे सांगितले असून त्यांनी बुधवारी (दि. २६) नगरपालिकेचे बांधकाम अभियंता यांनी तातडीने भेट देवून पाहणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी खोपोली नगरपालिकेसोबत या संदर्भात 26 जुलै 2023 पासून पत्रव्यवहार केलेला आहे. वेळोवेळी भिंत बांधून देण्याची विनंती केलेली आहे. परंतु, विविध कारणे देवून सदर कामाची अद्यापही सुरुवात झालेली नाही.
तर सुरू झालेल्या पावसाळ्यात कोणतीही गंभीर घटना घडल्यावर नुकसान भरपाई किंवा मदत करण्यापेक्षा सदर संरक्षक भिंतीबाबत त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच स्थानिकांनी आम आदमी पार्टीसोबत पत्रव्यवहार करून मार्ग काढण्याची विनंती केली आहे.
तर, मार्ग न निघाल्यास आप आंदोलनाच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करेल, असा आशावाद आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी व्यक्त केला आहे.
सदर भिंतीमुळे वित्तहानी वा जीवितहानी झाल्यास याची जबाबदारी खोपोली नगरपरिषदेची राहील. जुलै 2023 मध्ये तक्रार अर्ज दिल्यावर यावर तातडीने जून २०२४ च्या आधी काम पूर्ण गरजेचे आहे. परंतु, काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथे असणारे नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत.