हिंजवडी, ( वार्ताहर ) – हिंजवडी माण आयटी परिसरात बुधवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू असल्याने आयटीपार्कच्या सर्व रस्त्यांवर चक्का जाम होऊन आयटीयन्स कर्मचाऱ्यासह स्थानिक प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे सरकार व प्रशासनाविरोधात संतापजनक भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
अंत्यत वर्दळीचा असलेला माण व मारुंजी रस्ता तसेच लक्ष्मी चौक ते फेज 2 रस्त्यावर तीन चार तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरीकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. सकाळी आठ वाजल्यापासूनच आयटीतील रस्त्यांवर कोंडी झाली होती. त्यामुळे अनेक आयटीतील कर्मचारी दोन दोन तास कोंडीत अडकून पडले होते.
त्यातच सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने आयटी कर्मचाऱ्यांनी चारचाकी वाहने बाहेर काढून प्रवास केला. त्यामुळे इतर दिवसापेक्षा रस्त्यावर दुचाकी ऐवजी चारचाकी वाहनांची संख्या जास्त होती. पर्यायाने वाहतूक कोंडीत अधिकची भर पडली. त्यातच वाहतूक पोलीस कर्मचारी वारीच्या बंदोबस्तासाठी तैनात झाल्याने परिस्िथती अजूनच गंभीर झाली.
गेल्या आठवड्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयटीनगरीच्या समस्यांबाबत एक विशेष बैठक घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी विभागीय आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना या भागाचा पाहणी दौराही केला होता. परंतु प्राथमिक उपाययोजनांना देखील सुरुवात झाली नसल्याचे आजच्या वाहतूक कोंडीत दिसून आले.
हिंजवडीतील वाहतूक कोंडी व अन्य मूलभूत समस्यांबाबत अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी बऱ्याचदा इमेल, ट्वीट करून आपल्या संतापजनक भावना सर्व राज्यकर्त्यांपर्यत पोचविल्या आहेत. मात्र गेल्या दहा पंधरा वर्षांपासून हिंजवडीच्या समस्या व मूलभूत प्रश्न आहे तसेच आहेत. आशा प्रतिक्रिया आयटीयन्स मधून उमटत आहेत.
मेट्रोमुळे झालेले खड्डे त्रासदायक
आयटी उद्यानाच्या मुख्य रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने अनेक भागात खड्डे पडले आहेत. परंतु एमआयडीसी व पीएमआरडीए प्रशासन हे खड्डे बुजविण्याचे सौजन्य देखील दाखवत नसल्याने खड्डे चुकविताना वाहनचालकांची दमछाक होते. परिणामी वाहतूक संथ गतीने होऊन चक्का जाम होण्यास सुरुवात होत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
“काही भागात खड्डेमय रस्ते तर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. पावसामुळे दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनाची संख्या वाढल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती.
त्यामुळे माण रोड, फेज थ्री कडे जाणारा रस्ता किंवा टी जक्शन परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यातच आमच्याकडील 28 कर्मचारी वारीच्या बंदोबस्तसाठी पाठविल्याने उर्वरीत मनुष्यबळाच्या जोरावर ट्राफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रसाद गोकुळे – पोलीस निरीक्षक (हिंजवडी वाहतूक विभाग)
आयटीपार्कसाठी स्वतंत्र वॉररूम तयार करा..
” पावसामुळे गाड्यांची संख्या जरी वाढली तरी रस्त्यांची दयनीय अवस्था आहे तशीच आहे. सरकार व प्रशासनाला येथील समस्या सुटत नसतील तर हा भाग एखाद्या स्वतंत्र वेगळ्या यंत्रणेच्या ताब्यात द्या.
केवळ बैठका घेऊन काही फायदा होताना दिसत नाही. येथील प्रश्नांवर तत्काळ उपाय योजना व कार्यवाही होताना दिसली पाहिजे.
या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र वॉररुम तयार करा. की जिथे शासनाच्या सर्व प्रशासकिय विभागाचे अधिकारी 24 बाय 7 बसून तत्काळ समस्या सोडवतील, असे मत आयटी कर्मचारी प्रशांत ढाकणे यांनी व्यक्त केले.