Legislature Monsoon Session – देशाच्या पंतप्रधानांनी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची वल्गना केली होती, पण खरंतर ही जुमलेबाजी आहे. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेला नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जे हमीभाव मिळत होते, तेच 2024ला मिळत असतील, तर शेतकऱ्यांना फसवण्याचे काम या महायुतीने केले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्कारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांना हमीभाव देण्याबाबत सांगतील, अशी आशा होती. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असा घणाघात विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राज्य सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. यावेळी पत्रकार परिषद घेत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
विजय वडेट्टीवार म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे. ज्यांनी आयुष्यभर लोकशाहीचा पुरस्कार केला, त्याच कर्मभूमीत भाजपने दोन वर्षापूर्वी लोकशाहीचा गळा आवळला आणि बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केल्याचे या महाराष्ट्राने पाहिले.
म्हणूनच जनतेने या निवडणुकीत एक सनसनीत उत्तर या गद्दारांना दिले. या देशात दडपशाही करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे जनता कधीही उभी राहणार नाही, हा संदेश लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने दिला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर, बियाणांवर, ट्रॅक्टर, शेतीपयोगी अवजारांवर 18 टक्के जीएसटी लावतो. दुसरीकडे हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5 टक्के जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3 टक्के जीएसटी, सोने खरेदी करत असताना 2 टक्के जीएसटी लावतो. म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे, हे सिद्ध झाले आहे.