– प्रा. डॉ. सुभाष राठोड
महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे आपल्या राज्यास ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असे संबोधले जाते. छत्रपती शाहू महाराज यांची 26 जून रोजी जयंती साजरी केली जाते. जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याबाबत…
26 जून हा राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो.ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
शाहू महाराज अस्पृश्यता निर्मूलनासाठी आपल्या कुटुंबापासून प्रयत्न करत होते. एकदा शाहू महाराज शिरोळला गेले होते. तेव्हा महाराजांनी चहासाठी म्हणून शिरोळच्या तुकाराम कांबळे यांना चहाचे दुकान काढून दिले. ते नेहमी गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये स्वतः जात. चहा आणि फराळ घेत आणि त्यामुळेच अस्पृश्यतेचे वलय हळूहळू सौम्य व्हायला लागले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने, हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. कोल्हापूर येथील भवानी मातेचे मंदिर त्यांनी अस्पृश्य समजल्या जाणार्या समाजासाठी खुले केले.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना 1 रूपया दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. यामागचा उद्देश लोकांनी आपल्या मुलांना दररोज शाळेत पाठवावे, असा होता. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी 1919 मध्ये सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्या शाळा असेही उपक्रम महाराजांनी राबवले. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला.
आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून त्यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी धनगर जमातीतील राजघराण्याशी आपल्या घराण्याचे सोयरेसंबंध घडवून आणले. जातिभेद मोडण्यासाठीचा हा कृतिशील प्रयत्न होता. 1917 मध्ये त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. त्याचबरोबर जर एखाद्या स्त्रीला तिच्या घरातून वाईट वागणूक मिळत असेल तर अशा अपराधींना सहा महिने कारावास व दोनशे रुपये दंड करण्याची तरतूद देखील कायद्यात होती. घटस्फोट आणि वारसा कायदा सुद्धा त्यांनी पास केला होता. त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणाबाबत एक पाऊल पुढे जात त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये शिकणार्या सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी 1916 मध्ये निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. एकूण 23 वसतिगृहे अनेक जाती-जमातींसाठी, धर्मासाठी बांधली होती. त्यामुळे प्रत्येक जातीच्या लोकांना स्वतःचा विकास करण्याची संधी उपलब्ध झाली. ही वसतिगृहे सर्व जाती-धर्मासाठी खुली ठेवली. त्यामुळेच मराठा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांसह सर्व जातींमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची समान संधी मिळाली.
मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के राखीव जागांची (आरक्षणाची) तरतूद करून त्याची त्वरित अंमलबजावणी देखील महाराजांनी केली.
आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचेही महत्त्वाची जबाबदारी महाराजांनी पार पाडली. पुढील काळात या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली. यासाठी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले ‘मूकनायक’ हे पाक्षिक आर्थिक अडचणीमुळे बंद पडले होते. महाराजांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली. ‘शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते’ असे गौरवोद्गार बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले होते.
शाहू राजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. तरुणांना पदवीपर्यंत पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी राजाराम कॉलेजची स्थापना केली. वेठबिगारी ही पद्धत बंद केली. बारा बलुतेदार यांना कोणताही आवडीचा व्यवसाय करता यावा याची मुभा दिली आणि कामाचा मोबदला पैशाच्या स्वरूपात घेऊ शकतात असे आवाहन केले होते. महार वतन पद्धत 1918 मध्ये कायद्याने बंद केली.
‘स्पिनिंग अॅन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकर्यांना कर्जे उपलब्ध करून देणार्या पतसंस्था यांची स्थापना केली. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेती संशोधनावर भर दिला. नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. दुष्काळाचा सामना करता यावा यासाठी ‘राधानगरी’ धरण बांधले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता असा राजा होणे नाही!