पवन मावळ, (वार्ताहर) – पवन मावळ भागातील येळसे गावातील प्रगतशील शेतकरी रमेश आडकर यांच्या शेतात सध्या भात लागवड सुरू आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी संजिवनी मोहिमेअंतर्गत येळसे गावातील शेतकऱ्यांना भात लागवडीबाबत आधुनिक पद्धतीची माहिती दिली होती. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनाची वाट न पाहता पेरणी करून बाह्य पाणीपुरवठा करून भाताची रोपे वाढवली.
ही रोपे आता चांगलीच वाढली असून पाणीपुरवठा करून शेतकरी भात लागवड करत आहेत. त्यामुळे यापुढे कोसळणारा मान्सून हा अशा शेतकऱ्यांच्या भातपिकाला अधिक फायदेशीर ठरणार, असे शेतकरी सांगतात.
मावळ तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. मावळच्या इंद्रायणी तांदळाची चव जगभरात प्रसिद्ध आहे. सध्या मान्सून सुरू झाला आहे. मावळ तालुक्यात शेतशिवारात भाताची रोपे तरारताना दिसत आहेत.
सोबतच कृषी विभागाने राबवलेल्या खास कृषी संजिवनी मोहिमेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आधीच भाताची पेरणी केली होती, त्यांच्या शेतात भाताची रोपे चांगलीच वाढली असून शेतकऱ्यांनी भात लागवड देखील सुरू केली आहे.
भात लागवड सुरू असतानाच कृषी सहाय्यक विकास गोसावी, मंडळ कृषी अधिकारी काळेकॉलनी प्रशांत डहाळे आणि कृषी पर्यवेक्षक नागनाथ शिंदे यांनी भात शिवारात भेट दिली. सुयोग्य पद्धतीने लागवड सुरू असल्याचे निश्चित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भात लागवड करतात. परंतु, अधिकाधिक शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात लागवड करण्यास प्राधान्य देत होते.
कृषी विभागामार्फत आता शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून भात उत्पदनाच्या आधुनिक पद्धतीचा प्रसार करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी दिली.