मुंबई : वरुणराजा पुन्हा एका सक्रीय झाला आहे. मान्सूनने राज्यासह देशात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मुंबई शहर आणि उपनगरात मधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज आहे.
तर उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. ठिकठिकाणी शेतकरी पेरणी करताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पेरणीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
अकोल्याला झोडपले
अकोल्यात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने झोडपल्याने अकोट तालुक्यात पठार नदीच्या पाण्यात अचानकपणे वाढ झाली. त्यामुळे अकोल्यातील पनोरी आणि जणोरी गावाचा संपर्क तुटला आहे. सातपुडा पर्वतरांगात सुरु असलेल्या पावसामुळे पठार नदीला पूर आला आहे. सद्यस्थितीत दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे.