शेवगाव – तालुक्याच्यात मान्सूनपूर्व तसेच रोहिणी नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पेरणीस वेग आला आहे. काही भागात वापसा होताच तालुक्याच्या उर्वरित भागात खरीप पेरण्या पूर्ण होतील. खरीप क्षेत्राच्या ७८% पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, कृषी अधिकारी वैष्णवी घुले यांनी दिली.
यंदाच्या खरीप हंगामासाठी तालुक्याचे खरीप क्षेत्र ८४ हजार ६८८ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी कापूस ३७ हजार हेक्टर, बाजरी एक हजार ३००हेक्टर, तूर ७ हजार १०० हेक्टर, मूग ४५० हेक्टर, उडीद एक हजार ५० हेक्टर, भुईमूग १६५ हेक्टर, तीळ ५ हेक्टर, सूर्यफूल ४ हेक्टर, सोयाबीन ३५ हेक्टर, मका ३००हेक्टर, चारा पिके एक हजार १६० हेक्टर, भाजीपाला १८० हेक्टर, फळपिके ९०१ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय तालुक्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झालेली आहे. आता पेरण्या झाल्यावर पावसाची नितांत गरज असताना त्याने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे.
दरम्यान, तालुक्यात यंदाही कापसाची उच्चांकी क्षेत्रात लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. मात्र, शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे कपाशीचे बियाणे उपलब्ध होण्याबाबत अडचणी येत असल्याच्या शेतकऱ्यांतून तक्रारी आहेत. काही बियाणे विक्रेते कपाशीच्या बियाणाबरोबर इतर कंपन्यांचे नको असलेले बियाणे माथी मारीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मागणीप्रमाणे संबंधित कंपनीचे कपाशीचे बियाणे त्यांना उपलब्ध होईल, यादृष्टीने दखल घेण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फंदे यांनी केली. याबाबत दखल घेतली नाही तर अडवणूक करणाऱ्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन पुकारण्याचा निर्धार फुंदे यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला. निवेदनाच्या प्रती राज्याचे कृषिमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत .