श्रीकांत कात्रे
हलाखीच्या परिस्थितीत मोठा संघर्ष करणे भाग पडते. अशा वेळी डगमगून न जाता पुढे चालत राहण्याची जिद्दच योग्य मार्ग दाखवते. आदिवासी भागातील जयवंती भोये यांनी संघर्ष करत असताना हिंमत दाखवली. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला आपला
पारंपरिक व्यवसाय वाढविण्याचे त्यांनी ठरविले. या व्यवसायातून स्वतः ची प्रगती साधताना आरोग्यदायी उत्पादनामुळे इतरांच्या वेदना कमी करण्याची संवेदनाही त्यांच्या मनात जागी होती. म्हणूनच त्यांनी त्यांच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली. आपले उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला.
जंगलाच्या सानिध्यात जीवन जगणारे अनेक जण नेहमी तंदुरूस्त राहतात. आपल्या आरोग्यासाठी अनेक औषधी वनस्पतींचा उपयोग ते करत असतात. परंतु, अशा वनस्पतींची योग्य माहिती असणारे फार थोडे असतात. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्याच्या आदिवासी भागातील भोयेपाडा येथील जयवंती भोये यांनी अशाच माहितीच्या आधारे आपले परंपरेने उत्पादन वाढविण्याचे ठरविले. त्यातूनच निर्गुडीचे तेल उत्पादित करून त्याचा व्यवसाय सुरू करण्याचे जयवंती भोये यांनी ठरविले. पण हे सारे करायचे तर संघर्षाबरोबर कष्ट करणे क्रमप्राप्त ठरते. एकदा ठरविल्यानंतर ते तडफेने पूर्ण करण्याचा जयवंती यांचा स्वभाव कामी आला. हलाखीच्या परिस्थिती सुधारायची असेल तर कष्ट केले पाहिजेत, ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आणि त्या कामाला लागल्या.
गुडघेदुखी, सांधेदुखी अशा वेदना दूर करणारे निर्गुडीचे तेल तयार करण्याचे त्यांनी निश्चित केले होते. त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे जंगलातील औषधी वनस्पती. अशा बारा प्रकारच्या वनस्पती या उत्पादनासाठी आवश्यक असतात. मोहरी, कापूर तिळाचे तेलही गरजेचे असते. या सर्व वनस्पती संकलित करण्याचे काम त्यांना स्वतःलाच करावे लागते. मेहनत करून सारा कच्चा माल गोळा करायचा आणि नंतर त्यावर प्रक्रिया करून उत्पादन घ्यायचे, हा सारा प्रवास कष्टाचाच. त्याशिवाय उत्पादन तयार करण्याची प्रक्रिया अखंड सुरू ठेवावी लागते. मोहरी किंवा कापूर तिळाचे तेल याबरोबरच साऱ्या वनस्पतींचे मिश्रण एकत्र करून ते पातेले चुलीवर ठेवून ही प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया थांबवता येत नाही. तेलाचा एक डबा भरला की दुसरा भरून घ्यायचा.
हे चक्र सुरूच राहते. निर्गुडी, कडुलिंब, तुळस, जास्वंद, अडुळसा, निलगिरी तसेच फांगुटा ही जंगलातील वनस्पती अशा विविध घटकांपासून हे निर्गुडीचे तेल तयार करण्यात येते. हे उत्पादन करत असतानाच माणदेशी फाउंडेशनशी त्यांचा संपर्क आला. माणदेशीने आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर हिशोब, मार्केटिंग तसेच ग्राहकांशी संवाद साधण्याचे तंत्र माणदेशीने शिकवले. डीजिटल माध्यमातून उत्पादन अनेक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी मदत होऊ लागली. उत्पादन आकर्षक पद्धतीने मार्केटमध्ये जावे यासाठी जयवंती यांना पॅकेजिंगसाठी बाटलीवर स्टिकर्स तयार करून देण्यात आली. त्यामुळे हे उत्पादन नाशिक, मुंबईसह महाराष्ट्रातील इतर लहानमोठ्या शहरांपर्यंत पोहचले. माणदेशी महोत्सवातील सहभागही महत्वाचा ठरला.
जयवंती यांचे पती, दोन मुले तसेच एक मैत्रिण जयवंती विरकुडे यांची या व्यवसायासाठी मदत होते. हा व्यवसाय करण्यासाठी अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. पण त्याचा रिझल्टही चांगलाच मिळतो, असे त्या सांगतात. खरं तरं हे उत्पादन लोकांच्या आरोग्यासाटी उपयुक्त आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, हातपाय दुखणे, चमक, पाठदुखी अशा दुखण्यात आराम मिळण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे तेल शरीराच्या आतून काम करत नाही. वरतून काम करते. त्यामुळे इन्फेक्शन होणे किंवा इतर दुष्परिणाम होत नाही, असे त्या सांगत होत्या. मात्र, हे तेल आरोग्यासाठी उपयुक्त आहे, हे लोकांना पटवून द्यावे लागते. त्यामुळे मार्केटिंगसाठी बोलण्याची कलाही त्यांना अवगत करावी लागली आहे. आयुर्वेदिक तेलाचे उत्पादन करणे ही गोष्ट सोपी नाही. त्याशिवाय एखाद्या महिलेने असा व्यवसाय कार्चे धाडस दाखविणेही दुर्मिळच.
पण जयवंती यांनी मनाशी हिंमत बाळगत जिद्दीने या व्यवसायात जम बसविला. जंगलातून वनस्पती आणण्यापासून तेल उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेपर्यंत सातत्याने कार्यरत राहणे ही साधी गोष्ट नाही. उत्पादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उत्पादनाचे मार्केटिंग करणे हाही भाग त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. जयवंती यांनी या सर्वच आघाड्यांवर यशस्वी कामगिरी केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी धाडसाने केलेला संघर्ष, घेतलेले कष्ट, दाखवलेली जिद्द, लोकांपर्यंत पोहचण्यासाठी केलेला प्रयत्न या साऱ्याच गोष्टी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. आदिवासी विभागातील एखादी महिला या पद्धतीने कार्यरत राहते, ही बाब आश्चर्य व्यक्त करण्यासारखीच आहे. स्वतःच्या जगण्याचा संघर्ष सुरू ठेवताना इतरांच्या वेदना दूर करण्यासाठी धडपडणाऱ्या जयवंती भोये यांचा प्रवास मोठा विलक्षण आहे. म्हणूनच त्यांची वाटचाल अनुकरणीय आहे.