हमीरपूर – हिमाचल प्रदेशातील विरोधी पक्ष नेते जयराम ठाकुर यांनी राज्यात सरकार स्थापन करण्याचे आपले स्वप्न विसरून जावे. आमच्याकडे ३८ आमदार आहेत. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका प्रकरणावरून ठाकुर लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याऐवजी ठाकुर यांनी त्यांच्या पक्षाच्या ज्या ९ आमदारांच्या विरोधातील याचिका विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहेत त्याचा विचार करावा असे विधान हिमाचलचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते सुखविंदर सिंह सुखु यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ निर्माण झाली आहे.
हमीरपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या ९ आमदारांनी सभागृहात गुंडगीरीचा जो प्रकार केला, पटलावर ठेवलेले कागद फाडून अध्यक्षांसमोर भिरकावण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रकरणात महसूल मंत्री जगतसिंह नेगी यांनी याचिका दाखल केली आहे.
अध्यक्षांचा त्या याचिकेवरचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाने या प्रकरणात लवकर निर्णय घेण्याची विनंती अध्यक्षांना केली आहे. भाजपचे हे ९ सदस्य अपात्र ठरले आणि पुन्हा निवडणुका झाल्या तर त्यातील एखादाच चुकीने निवडून येईल. त्यामुळे सभागृहातील कॉंग्रेस आमदारांची संख्या ५० पर्यंत पाहोचेल. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न आता त्यांनी विसरून जावे.