चेन्नई : तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने 5 जण मृत्युमुखी पडले. आणखी २० जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. संबंधित दुर्घटना कल्लाकुरिची जिल्ह्यात घडली. दारू प्यायल्यानंतर तर काही जणांना उलट्यांचा आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. त्यातील काहींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी दुर्घटनेची तातडीने दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी एका दारू विक्रेत्याला अटक केली. राज्य सरकारने कारवाईचे पाऊल म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली. तसेच, पोलीस अधीक्षक आणि इतर ९ पोलिसांना निलंबित करण्यात आले. दुर्घटनेवरून तामिळनाडूतील विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.