मुंबई – फसव्या योजनेद्वारे (पॉन्झी स्कीम) गुंतवणूकदारांची 600 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबईस्थित आर्थिक सल्लागार आणि त्याच्या कंपनीविरुद्ध तपास सुरू केला आहे.
याअनुषंगाने ईडीने त्यांच्या बँक आणि डीमॅट खात्यांसह रोख रक्कम असे सुमारे 37 कोटी रुपये जप्त करण्यात आले. चार्टर्ड अकाऊंटंट अंबर दलाल आणि त्याच्या रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या विरोधात कारवाई करताना 21 जून रोजी मुंबई छापेमारी करण्यात आली.
त्यादरम्यान 37 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीने सांगितले. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत पॉन्झी स्कीमद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अंबर दलाल आणि त्याच्या कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यानंतर ईडीने या प्रकरणाची दखल घेत ही छापेमारी केली.