गुवाहाटी : सिक्कीमपाठोपाठ आता आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारीही येथील पूरस्थिती गंभीर होती. अनेक जिल्ह्यांतील चार लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत. कोपिली, बराक आणि कुशियारा यासह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. किमान १९ जिल्ह्यांतील सुमारे चार लाख लोकांना पूरग्रस्त भागात राहावे लागत आहे. या जिल्ह्यांमध्ये बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचार, दारंग, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, करीमगंज, कोक्राझार, लखीमपूर, नागाव, नलबारी, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तामुलपूर आणि उदलगुरी यांचा समावेश आहे.
विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
आसामच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे करीमगंजला सर्वाधिक फटका बसला. येथे दोन लाख लोक बाधित झाले. यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळात मृतांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. राज्यभरात 100 हून अधिक मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. या छावण्यांमध्ये सुमारे १४ हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. पुरामुळे रस्ते आणि पुलांचेही नुकसान झाले आहे.
राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने मदतकार्य सुरु केले असूनही आपत्तीच्या तीव्रतेपुढे नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न थिटे पडत आहेत. राज्य राखीव पोलिस दल, केंद्रिय पोलिस दलासह स्थानिक पोलिसांच्या यंत्रणाही आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात गुंतलेल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिले आहेत.