नवी दिल्ली : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत खेळलेले सर्व 4 सामने जिंकले आहेत. मात्र आज कोणताही संघ जिंकला किंवा हरला तरी या सामन्यात दोन्ही संघांच्या काही खेळाडूंना काही विक्रम मोडण्याची संधी आहे. आता ते रेकॉर्ड कोणते आहेत चला जाणून घेऊया…
अर्शदीप सिंगला आशिष नेहराचा विक्रम मोडण्याची संधी
भारताचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे या टी20 विश्वचषकात भारताचा माजी डावखुरा गोलंदाज आशिष नेहराचा विक्रम मोडण्याची संधी आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अर्शदीपला टी 20 मध्ये आशिष नेहराला मागे टाकून वेस्ट इंडिजमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याची संधी असेल. या दोघांच्या नावावर सध्या 10-10 विकेट आहेत. अर्शदीप सिंगने आज एक विकेट घेतली तर तो आशिष नेहराला मागे टाकेल.
अर्शदीप सिंगला आरपी सिंगचा विक्रम मोडण्याची संधी
टीम इंडियासाठी एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज आरपी सिंगच्या नावावर आहे. त्यानं 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या विश्वचषकात 12 बळी घेतले होते. या विश्वचषकात 10 विकेट्स घेणाऱ्या अर्शदीप सिंगकडे 3 विकेट्स घेऊन हा मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.
तंजीम हसन साकिब-रिशाद हुसैन यांना मोठा विक्रम करण्याची संधी
बांगलादेशसाठी एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम दिग्गज शाकिब अल हसनच्या नावावर आहे. त्याने 2021 च्या टी20 विश्वचषकात 11 विकेट घेतल्या होत्या. सध्याच्या टी20 विश्वचषकात वेगवान गोलंदाज तनझिम हसन साकिब आणि फिरकी गोलंदाज रिशाद हुसैन यांनी प्रत्येकी 9 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत जो 3 विकेट शाकिबचा विक्रम मोडेल.