Arvind Kejriwal – येथील विशेष न्यायालयाने शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांचा मुक्काम १२ जुलैपर्यंत तिहार तुरूंगात असेल.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने याआधी केजरीवाल यांना अटक केली. त्यानंतर सीबीआयने नुकतीच घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना औपचारिकरित्या अटक केली. त्यांची रवानगी ३ दिवसांच्या सीबीआय कोठडीत करण्यात आली.
त्या कोठडीची मुदत संपल्याने सीबीआयने केजरीवाल यांना विशेष न्यायालयात हजर केले. तपासासाठी आणि न्यायासाठी केजरीवाल यांना तुरूंगात ठेवणे गरजेचे असल्याची भूमिका सीबीआयने न्यायालयात मांडली.
तसेच, त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली. चौकशीकामी केजरीवाल सहकार्य करत नसल्याचा आरोपही सीबीआयकडून करण्यात आला.
ईडीनंतर सीबीआयने अटक केल्याने केजरीवाल यांच्या अडचणींत भर पडल्याचे मानले जात आहे. त्यांना ईडीशी संबंधित प्रकरणात विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला. मात्र, त्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.