Anu Agarwal : ‘आशिकी’ने बनवलं सुपरस्टार, अपघाताने हिरावली ओळख; अभिनेत्रीची हृदयद्रावक कहाणी
Anu Agarwal : ‘नजर के सामने’, ‘धीरे धीरे से’ आणि ‘मैं दुनिया भुला दूंगा’ यांसारखी गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत.

Anu Agarwal : ९० च्या दशकात आपल्या निरागस सौंदर्याने आणि अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अनु अग्रवाल पुन्हा चर्चेत आली आहे. ‘आशिकी’ या सुपरहिट चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या अनुच्या आयुष्यात एका भीषण अपघाताने अशी कलाटणी दिली की तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.
१९९० साली प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ या चित्रपटातून अनु अग्रवाल आणि राहुल रॉय यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, तर नदीम-श्रवण यांच्या संगीताने इतिहास रचला. ‘नजर के सामने’, ‘धीरे धीरे से’ आणि ‘मैं दुनिया भुला दूंगा’ यांसारखी गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत.
‘आशिकी’च्या प्रचंड यशानंतर अनु अग्रवालने ‘किंग अंकल’, ‘खलनायिका’, ‘जनम कुंडली’ आणि ‘रिटर्न ऑफ द ज्वेल थीफ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, तिच्या पुढील चित्रपटांना ‘आशिकी’सारखे यश मिळाले नाही. हळूहळू ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली आणि १९९६ नंतर तिने अभिनयालाच रामराम केला.
अनुने नंतर एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या सावळ्या रंगामुळे तिला इंडस्ट्रीमध्ये अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. गोरा मेकअप करण्यास भाग पाडले जात असल्याने तिने एक मोठी मॉडेलिंग असाइनमेंटही नाकारली होती. “मी जशी आहे तशीच स्वीकारा,” अशी ठाम भूमिका तिने घेतली होती.
हेही वाचा : Dahi ki Sabzi: आयुष्मान खुरानालाही आवडते ही खास दह्याची भाजी; रेसिपी झाली व्हायरल
मात्र, १९९९ मध्ये झालेल्या एका भीषण कार अपघाताने तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. या अपघातानंतर ती तब्बल २९ दिवस कोमात होती. शुद्धीवर आल्यानंतर तिने स्मरणशक्ती गमावली होती आणि तिला पुन्हा एकदा जीवनातील मूलभूत गोष्टी शिकाव्या लागल्या.
एका मुलाखतीत अनुने सांगितले की, तिच्या आईने जेव्हा तिला ‘आशिकी’ चित्रपट दाखवला, तेव्हा ती स्वतःलाच ओळखू शकली नाही. या धक्कादायक अनुभवानंतर तिने २००१ मध्ये ग्लॅमरच्या दुनियेला कायमचा निरोप दिला आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.
२०१५ मध्ये तिने ‘An Unusual Memoir of the Girl Who Came Back from the Dead’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात तिने चित्रपटसृष्टीतील काळ हा तिच्या आयुष्यातील सर्वात दुःखद काळ असल्याचे म्हटले आहे.
आता अनेक वर्षांनंतर अनु अग्रवाल पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतण्याच्या तयारीत आहे. एका चांगल्या कथानकाच्या शोधात ती चित्रपट निर्मात्यांना भेटत असून, “पुनरागमन करणार असेन तर काहीतरी खास आणि प्रभावी करेन,” असे ती म्हणाली आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis : पुण्यात विषारी दारूने 13 जण दगावले; CM फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, थेट आदेश देत म्हणाले…





